Skip to main content

कामातून गेलेली केस ते आवाजाचा बादशहा - बाबासाहेब लोंढे

 कामातून गेलेली केस ते आवाजाचा बादशहा बाबासाहेब लोंढे


        डोक्यात शब्दांचे खूळ शिरले की माणसाला दुसरे काही सुचतच नाही.शब्दांसाठी काय काय करु आणि कसे करु हेच त्याच्या डोक्यात सुरु असते.अशी माणसे एका वेगळ्याच जगात आणि वेगळ्याच धुंदीत जगत असतात.व्यावहारिक दुनियेतील लोक अशा माणसांना 'कामातून गेलेली केस' याच दृष्टिकोनातून बघत असतात.अशाच एका कामातून गेलेल्या माणसाची ही कथा...

     हातात वही,काखेत रेडिओ,खिशात पेन आणि सोबत पोस्टकार्डांचा गठ्ठा..एकीकडे रेडिओ सुरु तर दुसरीकडे कथा,कवितांचे सुचणे सुरु..लगेच ते वहीत उतरवले जायचे किंवा रेडिओवरचा कोणताही कार्यक्रम आवडला कि लिहीलेच आकाशवाणीला पत्र!

     इकडे रेडिओच्या सुमधूर कार्यक्रमात तल्लीन झालेला बाबा आणि काडीच्या कामात मदत करत नाही म्हणून मागे सुरु असलेली बापाच्या शिव्यांची लाखोली.एक आवाज परमानंद देतोय तर दुसरा आवाज आत्म्याला डागण्या देतोय.पहिला आवाज बंद केल्याशिवाय दुसरा आवाज बंद होणार नाही हे ठरलेलेच.पण पहिला आवाज बंद केला तर जगण्यात राम वाटत नाही आणि दुसरा आवाज कानावर पडावा अशी इच्छा नाही.मग?

   निघाला घर सोडून..कधी या नातेवाईकाकडे तर कधी त्या नातेवाईकाकडे,नाहीच तर मग एखाद्या मित्राकडे..! चार आठ दिवसांनी पुन्हा घर...रेडिओने जिल्ह्यापासून राज्याच्या राजधानीपर्यंत मित्रवर्ग जोडलेला.माणसांनी समृद्ध असलेला हा माणूस पैशाने मात्र फारच फाटका...

     मी ही याच वाटेवरचा एक वाटसरु.दोघांच्या परिस्थितीत फरक काहीच नाही.वही,पेन,रेडिओ,पत्र आणि शिव्यांची लाखोली...दोन्हीकडे परिस्थिती सारखीच,फक्त ठिकाण वेगळे! अशा परिस्थितीत एका मोठ्या आजारातून सावरल्यानंतर मनाला प्रफुल्लित करण्यासाठी मोहोळ येथील नुकत्याच सुरु झालेल्या साप्ताहिकात महिना पाचशे रुपयांवर संपादनाचे काम पाहू लागलो.पहिला दिवाळी अंक संपादित केला.

     वाचनाची आवड असलेल्या बाबाच्या हाती तो अंक गेला आणि मला त्यांचे पहिले पत्र आले.मी ते पत्र आमच्या अंकात जसेच्या तसे छापले व आवर्जून तो अंक त्यांना पोस्टाने पाठवून दिला.....आणि मग सुरु झाला पत्रमैत्रीचा अखंड,अतूट नातेबंध!

    लोंढेवाढी...सीना नदीपासून दोन-तीन मैलावर वसलेले माढा तालुक्यातील एक गाव.काळीभोर सुपिक जमीन.याच गावातील भागिरथी व रघूनाथ या दांपत्याचा थोरला मुलगा बाबासाहेब.शिक्षण लिहीता वाचता येण्याएवढेच.घरची सतरा अठरा एकर जमीन.बाबा व संजय असे दोघे भाऊ.संजय शेतीत हातभार लावत होता पण बाबाचे मन रानात रमले नाही आणि पोरगा हाताखाली करु लागत नाही म्हणून बापलेकाचे कधी जमले नाही.सतत हमरीतुमरी सुरु असायची.अशीच एकदा हमरीतुमरी झाली आणि बाबांनी घर व गाव सोडले.

      मी अकरा वाजता अॉफिसमध्ये गेलो होतो.( अॉफिस म्हणजे तरी काय? आठ बाय दहाची उभ्या आडव्या पत्र्यांची खोली.) तर गेल्या गेल्या संपादकांनी एकजणाकडे बोट दाखवून हे तुम्हाला भेटायला आले आहेत असे सांगितले.हातात एक कळकट पिशवी,अंगावर मळकेच कपडे.माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

  " मी बाबासाहेब लोंढे..लोंढेवाडीवरुन आलोय."

....ही आमची समोरासमोर झालेली पहिली भेट!का आलोय?कशासाठी आलोय? सगळे सविस्तर सांगितले.संपादकांना सांगून अॉफिसमध्येच त्यांची राहण्याची सोय केली.पण जेवणाचे काय?

     घरात सगळ्यांच्या हातात पैसा..मीच एकटा कंगाल आणि नाकमविता.विनातक्रार पोटाला घालत होते हेच खूप.अशात माझ्याबरोबर आणखी एकजणाचा डब्बा द्या असे कोणत्या तोंडाने सांगणार होतो? आणि पगारीचे (?) पाचशे रुपये एस.टी.च्या तिकीटालाच पुरत नव्हते.ते ही रोज तिकीटाएवढेच दिले जायचे.मग मी तरी त्यांच्या जेवणाची सोय कशी करणार होतो?मग एकाच डब्यात आम्ही दोघे जेवायचो.त्यांनी जास्त खावे असा प्रयत्न करायचो.दिवस कसा तरी पार पडायचा पण रात्र ते पाणी पिऊन घालवायचे.मला हे दिसत होते पण मी काही करु शकत नव्हतो.त्यांनी घालवलेली ती ३१ डिसेंबरची रात्र ते मला जेव्हा जेव्हा सांगतात तेव्हा तेव्हा माझ्या काळजाला घरे पडतात.

     धट्टाकट्टा गड्याला मी नेलेल्या तेवढ्या डब्याने काय होतेय? बाहेर नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष आणि बाबांच्या पोटात मात्र भूकेचा आगडोंब.झोप येता येईना.पाणी तरी किती पिणार? बाबांची ही अस्वस्थता रात्री साडेअकरा वाजता अॉफिसकडे चक्कर टाकायला आलेल्या आनंद कुलकर्णी यांनी ओळखली व त्यांनी घरी जाऊन जे शिल्लक होते तेवढे जेवण आणून बाबाला जेवू घातले.

    पूढे आठ दहा दिवसांनी गावाकडून कुणीतरी न्यायला आले आणि बाबा गेले.पण आमच्या पत्रमैत्रीत खंड पडला नाही.


रुळलेली वाट सोडून वेगळी वाट अंगिकारली की आपली प्रतिमा लक्षवेधी होते हा संदेश देणारे बाबासाहेब लोंढे यांच्या शेतातील आकाशाच्या दिशेने मिरच्या वाढवणारे मिरचीचे झाड

           इथून गेल्यावर बाबांनी एक नवी वाट चोखाळली.प्रत्येक शाळेत जाऊन मुलांसमोर कथाकथनाचा कार्यक्रम सुरु केला.मुलांकडून एक एक दोन दोन रुपये जमा करुन शिक्षक ते पैसे बाबासाहेबांना मानधन म्हणून द्यायचे.कुठे जास्त मिळायचे,कुठे काहीच मिळायचे नाही.पण म्हणून त्यांनी कार्यक्रम करणे सोडले नाही.कार्यक्रमानिमित्त फिरताना अनेक ओळखी झाल्या.शुद्ध शाकाहारी असलेल्या बाबांमधील गुण 'अहिंसा परमो धरम' जपणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने ओळखले आणि त्यांच्यावर अहिंसेचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी सोपवली.त्यासाठी त्यांनी बाबाला एक मारुती व्हॅन दिली.पुन्हा फिरस्ती सुरु झाली.

[जीवावर बेतलेला प्रसंग...]

[एकदा बाबासाहेब मारुती व्हॅन घेऊन भेटायला आले होते.नंतर ते दुसऱ्या एका मित्राला भेटायला निघाले होते.कॅनॉलच्या साईडपट्टीवरुन जावे लागत होते.रस्ता अरुंद.नविन लोक कॅनॉल पाहूनच घाबरतात.गाडीचा वेग कमीच होता.काय झाले माहिती नाही पण गाडीची डाव्या बाजूची दोन्ही चाके पट्टीवरुन खाली उतरली.गाडी झुकली.कॅनॉलचा भरावा २०-२५ फुट उंचीचा आणि तो भरावा टाकण्यासाठी माती उचलल्याचा दहा फुटाचा खड्डा.बाबांनी गाडी नियंत्रित करुन थांबवली.अंगाचे पाणी पाणी झालेले.उजव्या बाजूने ते हळूच खाली उतरले.मग जीवात जीव आला.गाडी झुकलेली बघून माझे चुलतभाऊ पळतच मला सांगायला आले.मी ही लगेच धावत तिकडे गेलो.लोकांना मदतीला बोलवून गाडी अक्षरशः उचलून रस्त्यावर ठेवली.
   गाडी नियंत्रित झाली नसती तर गाडीने चार पाच पलट्या मारल्या असत्या आणि स्फोट झाला असता कारण गाडी गॅसवर चालणारी होती व गाडीत दोन  गॅस सिलेंडर होते.]

कथाकथन ही करायचे व अहिंसेचा प्रचार ही करायचा.याचवेळी त्यांनी निसर्गाचं आक्रंदन व जीव आहे आम्हालाही अशी दोन पुस्तके लिहीली व ती वर्धमानशेठ खांडवीकर यांनी प्रकाशित ही केली.

      या भ्रमंतीतून फायदा असा झाला की मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या.मिठास वाणी,मधाळ बोलणे आणि नम्र स्वभाव यामुळे राजकारण्यांपासून उद्योगपतीपर्यंत सर्वजण त्यांचे मित्र झाले.

      या ओळखीतूनच त्यांनी मग त्यावेळच्या ई टिव्ही मराठी या वाहिनीसाठी जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम पहायला सुरुवात केली.हे काम करताना पहिलीच जाहिरात दिली आ.बबनदादांनी..ती ही तब्बल दहा हजारांची!खिशात शंभर रुपये असले तरी जग जिंकल्याचा आनंद होणारे बाबासाहेब...यावेळी त्यांची अवस्था काय झाली असेल?

    आर्थिक गाडी हळूहळू रुळावर येत होती.अथक धडपडीला यश येत होते.किर्तीचा सुगंध सर्वदूर पसरु लागला होता.आणि या सुगंधाला मोहून एका फुलपाखराचे मन वेडावत चालले होते.त्या फुलपाखराचे नाव होते पल्लवी..फुलपाखराला जशी फुलाची ओढ असते तशी फुलालाही फुलपाखराची सोबत हवीच असते की!

     थोडक्यात काय तर "या या मामाच्या पोरीला" बाबांनी "एका झटक्यात पटवली" असे म्हणता येईल.ही प्रेमकथा अशी हळूहळू बहरत होती.तुम्ही आम्ही म्हणाल, मामाची तर मुलगी आहे,धुमधडाक्यात लग्न केले असेल.पण बाबाच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टी इतक्या सहजासहजी जुळून आलेल्या नाहीत.हे तर लग्न होते.ते तरी कसे सहज पार पडणार? पण दोघांच्या एकमेकांवरील प्रेमापुढे कुणाचेच काही चालले नाही आणि हे लग्न इतर लग्नाप्रमाणे पार पडले.

    नव्याचे नऊ दिवस संपले आणि बाबाला वेगळा संसार थाटावा लागला.यथावकाश प्रेम व प्रतिक ही जुळी मुले झाली.


एक आदर्श कुटूंब
प्रेम...प्रतिक...पल्लवी...आणि...बाबासाहेब

मुले मोठी होत होती,खर्च वाढत होता.वाहिन्यांचे पेव फुटले होते.जाहिरातदार तरी कुणा कुणाला जाहिराती देणार?त्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ लागली.मग यावर उपाय म्हणून बँकेचे कर्ज घेऊन शेती डेव्हलप करायची व जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करायचा असे ठरले.
         कर्ज मंजूर झाले आणि बाबांनी एकदम आठ दहा संकरीत गाई खरेदी केल्या.शेतीही डेव्हलप केली.अफाट खर्च केला.आता चांगले दिवस येतील म्हणता म्हणता भयानक दुष्काळ पडला.हा दुष्काळ फक्त शेतकऱ्यांना दिसतो,बँकांना थोडाच दिसतो?
         करायला गेलो मारुती आणि झाले माकड अशी बाबांची अवस्था झाली.कर्ज फेडायचे तरी कसे हा एकच यक्षप्रश्न समोर होता.गाई विकाव्या तर दुष्काळामुळे त्या घेणार तरी कोण?तरीही लाखाचे बारा हजार आले तरी लाखमोलाचे म्हणून येईल त्या किमतीला गाई विकल्या व थोडेफार कर्ज फेडले.
          आता खायचे काय? या प्रश्नाला अजिबात उत्तर नव्हते.याच्याकडून थोडे पैसे आण..त्याच्याकडून थोडे पैसे आण असे करुन जगणे सुरु झाले.कोण कितीही जवळचा असला तरी किती वेळा देणार पैसे? आणि माघारी येणार नसतील तर प्रत्येकजण हात वर करणारच...! शेवटी कुणीही हात ऊसने पैसे देईनासे झाले.
         अखेर परिस्थिती इतकी गंभीर झाली कि भाकरीचे पीठसुद्धा आणणे महाग झाले.आठ दिवस या कुटूंबाने नुसत्या भातावर आणि पाण्यावर काढले.पण का म्हणून आपण या फकिराबरोबर लग्न केले असे पल्लवी यांना कधीच वाटले नाही.

प्रेम आंधळे असले तरी ते खरे असले म्हणजे काही काळाच्या कठीण प्रवासानंतर सुखाची सावली मिळतेच मिळते!

    उलट हे ही दिवस जातील असा धीर देऊन त्यांनी बाबांच्या मनाला उभारी देण्याचाच प्रयत्न केला.त्यांची साथसंगत त्यांनी कधीच सोडली नाही.


आठ दिवस पाणी पिवून व मिळाला तर भात खावू घालून कुटूंब पोसण्याची वेळ आली तरी बाबासाहेबांची साथ न सोडणारी हीच ती गृहिणी आणि सच्च्या प्रेमाची सच्ची कहाणी!

      यावर काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होते.स्वस्थ बसून चालणार नव्हते.ज्यांना बाबांबद्दल सहानुभूती होती त्यातलेच एक म्हणजे सोलापूर आकाशवाणीचे निवेदक गुरुशांत धुत्तरगावकर...त्यांनी बाबांना त्यांच्यातील सुप्त कलेची जाणिव करुन दिली व योग्य ते मार्गदर्शन केले.
        ...आणि सुरु झाला बाबांचा एक नवा प्रवास.एखाद्या छोट्या उद्योगाची जाहिरात आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण व दमदार आवाजात रेकॉर्डिंग करायची,ती क्लिप वाटसपवरुन त्या उद्योगाच्या मालकापर्यंत व इतर सगळीकडे पोहोचवायची.सर्वांना आपण हे काहीतरी नविन ऐकतोय अशी अनुभूती येऊ लागली.हळूहळू उद्योजक,छोटे व्यावसायिक आपल्या व्यवसायाची जाहिरात बनवून घेण्यासाठी स्वतः होऊन येऊ लागले.कुणाच्या लग्नसमारंभात निवेदक म्हणून बोलावणे येऊ लागले.गाडी पुन्हा रुळावर येऊ लागली होती.
           अशातच २०१४ च्या लोकसभा,विधानसभा निवडणूका लागल्या.एव्हाना बाबांच्या आवाजाची किर्ती मोठमोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचली होती.सगळ्यांना बाबांच्या आवाजातच प्रचार कॅसेट,क्लिप बनवून हवी होती.स्थानिक उमेदवारांची तर रीघ लागलेलीच होती पण बीडवरुन खास पंकजाताईंचे बोलावणे आले.सगळी व्यवस्था त्यांची..जायचे व आपला आवाज द्यायचा.गेले.रेकॉर्डिंग झाले.
        कधी पाच रुपयालाही महाग असलेल्या,कधी भातावर दिवस काढलेल्या,कामातून गेलेली केस म्हणून गावाने व नातेवाईकांनी हिणवलेल्या बाबांच्या आवाजाची त्यादिवशीची किंमत होती ५५ हजार रुपये!
       यानंतर मग बाबांनी मागे वळून पाहिलेच नाही.प्रत्येक निवडणूकीत उमेदवारांना बाबांचाच आवाज हवा असतो.रेकॉर्डिंग बनवून न्यायला आलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांना गावातील पटांगण पुरत नाही.बघेल तिकडे माणूसच माणूस.

   बाबांनी जे भोगले,जे अनुभव घेतले ते आपल्याला खरे तर त्यांच्या आत्मचरित्रातून सविस्तर समजेल.ते आत्मचरित्र लिहीतील अशी आशा करुया.मी हे अगदीच थोडक्यात मांडले आहे.पण कामातून गेलेली केस म्हणून हिणवले गेलेले बाबा ते आवाजाचा बादशहा हा बाबांचा प्रवास कसा वाटला ते जरुर कळवा.

    ...आणि १४ वर्षांचा वनवास संपला!

लोंढेवाडीला मी बाबांच्या लग्नालाच गेलेलो.त्यानंतर त्यांनी कितीतरी वेळा यायला सांगितले पण जाणे झाले नाही.दोन वर्षापूर्वी तेच सहपरिवार माझ्याकडे आले.जाताना लोंढेवाडीला येण्याचे परत एकदा निमंत्रण देऊन गेले.

    आमच्या शेजारच्या गावचे आमच्या दोघांचेही मित्र सिद्धेश्वर बचूटे हे ही कधी जायचे बाबाकडे? असे सारखे विचारायचे.पण जायचा योग काही जुळून येत नव्हता.अशात बाबांचे एक स्वप्न पूर्ण झाले.ते म्हणजे स्वतःचे आलिशान अॉफिस...

मग मात्र मलाच अॉफिस पहायचा मोह आवरला नाही आणि सिद्धूला सोबत घेऊन मी १४ वर्षानंतर ५ मार्च २०२१ ला लोंढेवाडी गाठली.त्या भेटीचा आनंद अवर्णनिय असाच आहे.

अनिल एस.राऊत

८९९९६८९९५७


Comments

  1. बाबा म्हणजे माणसातील देवमाणूस..आमच्या मित्रपरिवरातील सुवर्णपान.. बाबासाहेब तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला मनाचा मुजरा..!
    अनिलजी खूप वास्तव दर्षी लिखाण..डोळ्यात पाणी आणलं..

    ReplyDelete
  2. एक आदर्श व्यक्तिमत्व

    ReplyDelete
  3. संघर्ष यात्री - बाबासाहेब आपणास सलाम

    ReplyDelete
  4. खरंच इतका संघर्ष वाचल्यानंतर आपल्यासमोरील अडचणी अगदी किरकोळ वाटतात, ग्रेट लोंढे साहेब, आणि राऊत साहेबांचे लेखन पण ग्रेट

    ReplyDelete
    Replies
    1. - स्वप्निल सालगुडे, सालसे, करमाळा

      Delete
    2. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏼❤

      Delete
  5. ज्या विद्यार्थ्यांना शिकवत शिकवत मी त्यांचे पासून खूप काही शिकलो,व चांगला शिक्षक बनण्याचे मार्गावर मी मार्गस्थ झालो.
    या माझे शिक्षक रुपी जडण घडणीत योगदान देणारे विद्यार्थ्यांपैकी एक म्हणजे.....
    माझ्या लोंढेवाडी चा *बाबा*
    आज त्याचे कार्य,प्रगती,
    चांगल्या कार्यात सर्वांना मदत करताना पाहून अभिमान वाटतो.
    पुढील कार्यास खूप खूप
    शुभेच्छा...... *बाबासाहेब लोंढे*
    💐🎊🎊✨🌹✨🎊🎊💐

    ReplyDelete
  6. अप्रतिम, बाबासाहेब द ग्रेट , सॉल्युट👌👌👌😘

    ReplyDelete
  7. असामान्य व्यक्तिमत्व
    शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय बाबा.
    बाबा आपण यशाची शिखरे पार करू हीच आमची आपणास शुभेच्छा.

    ReplyDelete
  8. आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगाला सामोरं कसं जायचं हे बाबासाहेब यांच्याकडून शिकावं.
    आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित शब्दप्रपंच लेखनिच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचं औदार्य दाखवल्याबद्द्ल अनिलजी तुमचं मनापासुन अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे नाव समजले नाही,पण "ज्याची जाहिरात..त्याचीच वरात" अशी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना तुमचा आमचा संघर्ष दिसत नाही कारण अशा बातम्या दिल्याने त्यांचा प्रपंच चालत नसतो.अशा दुर्लक्षित संघर्ष कथा जगासमोर आणणे हाच प्रेरणा News चा उद्देश आहे.

      Delete
  9. खूपंच प्रेरणा देणारा प्रवास आहे आपला , कितीही मोठं संकट आलं तरी खचून जायचं नाही आणि त्या संकटात जर आपल्या जोडीदाराची साथ लाभली तर ते संकट , संकट राहत नाही . हा प्रवास वाचल्यानंतर आपलं आत्मचरित्र वाचायची उत्सुकता लागली आहे .

    ReplyDelete
  10. आयुष्यामध्ये येणाऱ्या कठीण प्रसंगाला कसं जायचं व त्याच्यावरती मात कशी करायची हे बाबा काका कडून शिकाव

    ReplyDelete
  11. ही कामातून गेलेले केस नव्हती...

    एक कलावंताला आपली कला सादर करण्यासाठी... आपल्या सुप्त गुणांना न्याय देण्यासाठी.... योग्य व्यासपीठ मिळत नव्हतं......

    ते व्यासपीठ मिळायला थोडासा उशीर झाला...


    ReplyDelete
  12. Inspiration for many people..
    बाबासाहेब लोंढे सर.. तुम्ही खुप मोठे कलाकार आहात.
    आणि कुटुंब पण एक आदर्श कुटुंब आणि मायाळू आहे,🙏

    ReplyDelete
  13. बाबा म्हणजे मैत्री तील बादशहा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीने रडवलेला आणि कलेने हसवलेला जगप्रसिद्ध चित्रकार - रत्नदीप बारबोले

  नियतीने रडवलेला आणि कलेने हसवलेला जगप्रसिद्ध चित्रकार - रत्नदीप बारबोले [ प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात.ते गुण जेव्हा जागृत अवस्थेत येतात तेव्हा त्याची कला बनते.हीच कला कालांतराने छंद,आवड बनते आणि माणूस त्या छंदाने झपाटला जातो.त्या झपाटलेपणाला जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याचा रत्नदीप बारबोले होतो.होय..योग्य मार्गदर्शनामुळेच घडलेल्या जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बारबोले यांचा हा जीवनसंघर्ष...] माढा तालुक्यातील सीना दारफळ हे एक गाव..आणि त्या गावातील बळीराम बारबोले हा अशिक्षीत पण जिद्दी माणूस! शेतीत काही नाही,नोकरीच महत्त्वाची असे त्यांचे विचार...! स्वतः अडाणी असुनही धाकट्या भावाला शिकवून नोकरी लावायची ही त्यांची जिद्द.आणि त्यासाठी त्यांनी स्वतः काबाडकष्ट करुन भावाला इंजिनियर बनवले.आता आपल्याला सुखाचे दिवस येतील असे वाटत असतानाच जे प्रत्येक घरात घडते तेच त्याही घरात घडले.हात पोहोचल्यानंतर आपल्यासाठी कुणी किती खस्ता खाल्ल्या हे माणसाला आठवत नाही.ते घरही याला अपवाद नव्हते.      असा हा दुखावलेला आणि मनात काही ठरवून पुन्हा जिद्दीला पेटलेला माणूस.पत्नी...

फिनिक्स शेतकरी - दत्ता सुतकर

  फिनिक्स शेतकरी - दत्ता सुतकर [ वय अवघे ३२ वर्षे..पण बऱ्या-वाईटाचा खूप अनुभव घेत,जिद्दीने आणि एका ठराविक ध्येयाने कठीण परिस्थीतीतही मनाचा तोल ढळू न देता संघर्षातून सुबत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आणि सगळे संपले आहे असे वाटत असतानाच 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे भरारी घेणाऱ्या सौंदणे ता.मोहोळ येथील दत्ता सुतकर या तरुण शेतकऱ्याची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे.मुळातच सौंदणे व आसपासचा भाग हा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो.या भागावरच अनेक साखरसम्राट गबरगंड झाले.पण शेतकरी आहे तिथेच आहे.ज्याने ऊस केला नाही तो कामातून गेला अशा दृष्टीने इतर लोक ऊसपीक न घेणाऱ्या शेतकऱ्याकडे बघत असतात.मात्र दत्ता सुतकर या तरुण शेतकऱ्याने ऊसपीकाकडे पूर्णपणे पाठ फिरवून वेगळा मार्ग अवलंबला आणि त्यांची आता संघर्षातून सुबत्तेकडे वाटचाल सुरु आहे.अशा जिद्दी शेतकऱ्याची ही विस्मयकारी वाटचाल....]    साधारण वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे २००५ सालापासून शेतीची जबाबदारी अंगावर पडलेले दत्ता सुतकर यांचे ते वय म्हणजे तसे नाकळतेच होते.त्यामुळे इतर शेतकरी करतात तशीच त्यांच्या शेतीचीही सुरुवात झाली.ऊसाची टिपरी बुडवायची,वारे...